मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये पार्किंगची व्यवस्था ही अडचणीची ठरत आहे. शहरांची व्याप्ती वाढत असताना कमी जागेच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं शहरांमध्ये पार्किंगचा वाद हा काही कालांतराने डोके वर काढत असतो. पार्किंगची ही समस्या असतानाच एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर प्रति चौरस किमीनुसार बिजिंग, शांघाय आणि टोकिया या जागतिक महानगरांपेक्षाही जास्त वाहने धावताहेत. यावर उपाय म्हणून शासनाने एक धोरण तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात वाहन पार्किंगची मोठे डोकेदुखी निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने एकात्मिक पार्किंग धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार पार्किंगसाठी जागा असेल, तरच कार खरेदी करता येणार आहे. हे धोरण आता तयार झाले असून, त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात करण्यात आले आहे.
मुंबईत प्रति चौरस किमी 8,508 वाहने (कार 2,512) आहेत. वाहनांचा आकडा बीजिंगमध्ये 389, शांघायमध्ये 849 आणि टोकियोमध्ये 1,800 एवढा आहे. या आकडेवारीमुळे त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या जागतिक शहरांच्या तुलनेत मुंबईतील वाहनसंख्या खूपच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची वाहन घनताही प्रति चौरस किमी 1293 वाहने एवढी आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीसह वायुप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभागाने हे पार्किंग धोरण तयार केले. नव्या पार्किंग धोरणाच्या निमित्ताने समोर आलेली ही आकडेवारी गंभीर असून याबाबत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मत आता तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, चेन्नईने एक पार्किंग धोरण आणले आहे, ज्यामध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी पार्किंग प्रूफ अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे. खासगी वाहनांचा वापर रोखण्याच्या उद्देशाने, या योजनेत पार्किंग व्यवस्थापन युनिट, नियुक्त क्षेत्रे आणि परिवर्तनीय शुल्क समाविष्ट आहेत. हा उपक्रम जबाबदार कार मालकीला प्रोत्साहन देतो आणि शहरी राहणीमान सुधारण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देतो. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी कोस्टल रोड अलीकडेच खुला करण्यात आला आहे. याशिवाय, सरकार मेट्रोच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. काल, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक वाढवण्याचा सल्ला दिला होता.