पावसाळा सुरू झाला नाही तोच अनेकांनीच पावसाळी सहलींचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसात भेट देऊन कल्ला करण्याची संधी मिळेल अशी ठिकाणं शोधण्यासाठीच्या चक्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. यातच हातभार म्हणून ही कमाल माहिती. अर्थात मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या अशा गिरीस्थानांची यादी, जिथं जाण्यासाठी मोठ्या सुट्टीची नाही, तर तिथं जाण्यासाठीच्या उत्साहाचीच जास्त गरज आहे.
आठवडी सुट्टीमध्येच एखाद्या सुरेख आणि कमाल अशा ठिकाणांना भेट देण्याचा बेत आखत असाल तर, नवी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असणाऱ्या गिरीस्थानांचा पर्याय उत्तम ठरु शकतो. आश्चर्य म्हणजे पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणांचं सौंदर्य इतक्या सुरेख पद्धतीनं बहरतं की त्यापुढे हिमाचल आणि दार्जिलिंगचं सौंदर्यसुद्धा फिकं पडेल. विश्वास बसत नाहीये? तर पाहा या ठिकाणांची यादी…
लोणावळा
नवी मुंबईपासून साधारण तास, दीड तासाच्या अंतरावर अससणाऱ्या लोणावळा इथं पोहोचण्यासाठी नवी मुंबईपासून अवघ्या 62 किमी अंतराचा प्रवास करावा लागतो. इथं भाजलेला मका, मटण थाळी ते अगदी चिक्कीपर्यंतच्या एकाहून एक कमाल पदार्थांची चवही चाखता येते. पावसाळ्यात इथं दिसणारे आणि प्रवाहित होणारे धबधबे म्हणजे दुग्धशर्करा योग.
माथेरान
मध्य रेल्वेनं किंवा मग नवी मुंबईहून थेट रस्तेमार्गानं तुम्ही माथेरान या ठिकाणी पोहोचू शकता. इथं येऊन टॉयट्रेन, इथला निसर्ग आणि टुमदार गावांचं निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याची संधी तुम्हाला मिळते. बाहेरच्या राज्यांमधील टॉयट्रेनला विसरायला लावे अशीच सफर इथली टॉयट्रेन घडवते.
खंडाळा
नवी मुंबईपासून साधारण 62.9 किमी अंतरावर असणारं आणखी एक गिरीस्थान म्हणजे खंडाळा. गप्पा मारता मारता कधी इथं पोहोचाल हे लक्षातच येणार नाही आणि इथं पोहोचल्यानंतर पर्यटकांना भुरळ पाडायला इथला निसर्ग आहेच की.
इगतपुरी
नवी मुंबई, मुंबईपासून थोडं दूर असणारं आणखी एक ठिकाण आहे इगतपुरी. तुलनेनं इथपर्यंतचा प्रवास मोठा असला तरीही इथं पोहोचल्यानंतर भारावणारा निसर्ग प्रवासाचा सर्व क्षीण दूर करेल यात शंकाच नाही.
कर्जत
नवी मुंबईपाहून 41 किमीवर असणाऱ्या कर्जमध्ये येऊन पावसाळ्यात या ठिकाणाला पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव. या ठिकाणी कोसळणारा पाऊस आणि हिरवागार निसर्ग मन रोखूनच धरतो.
शहरापासून अगदी जवळ, प्रवासाच्या बाबतीत अनेक पर्याय उपलब्ध असणारी ही ठिकाणं कमी खर्चात फिरता येतात. मुख्य म्हणजे इथं आलं असता खाण्यापिण्याची आबाळ होत नाही, आणि इथं येण्यासाठी मोठ्या सुट्टीचे अर्जही करावे लागत नाहीत. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यासाठी ही ठिकाणं तुमच्यासाठी उत्तम पर्याय.