गेल्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. मुंबई, पालघर, ठाणे आणि नवी मुंबई या चार जिल्ह्यांमध्ये हवामानात महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर कोकणातील रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत आज ढगाळ वातावरण असून, कमाल तापमान 33°C आणि किमान तापमान 25°C इतके अपेक्षित आहे. आर्द्रता सुमारे 86 टक्के राहील. त्यामुळे हवामान दमट वाटू शकते. IMD ने 23 आणि 24 मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, ज्याचा अर्थ जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांत मुंबईत 100 मिमीहून अधिक अनियमित पाऊस नोंदवला गेला आहे.
पालघरमध्ये आज ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33°C आणि किमान तापमान 27°C इतके अपेक्षित आहे. हवेतील आर्द्रता सुमारे 83 टक्के राहील. IMD ने 23 मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागात पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.
ठाण्यात आज ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33°C आणि किमान तापमान 26 °C इतके अपेक्षित आहे. आर्द्रता सुमारे 87 टक्क्यांवर राहणार असून 23 आणि 24 मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
नवी मुंबईत आज ढगाळ वातावरण असून कमाल तापमान 33°C तर किमान तापमान 26°C राहील. हवेतील आर्द्रता सुमारे 85 टक्के राहणार असून 22 ते 24 मेसाठी वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.