तुमच्या मुलासाठी चांगलं स्थळ आहे, एजंट बनून निर्जनस्थळी बोलावलं अन् जीव घेतला, मारेकरी निघाला…

“तुमच्या मुलासाठी चांगलं स्थळ आहे, मुलगी दाखवतो” असे खोटे सांगून लातूरजवळील कवा गावात आरोपीने सख्ख्या भावालाच फसवून बोलावून घेतलं. त्यानंतर स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने त्याच्या डोक्यात हातोडीने घाव घालून, दोरीने गळा आवळत खून केल्याची घटना घडली आहे.

लातूर शहराजवळील स्मशानभूमीच्या शेजारी एका अनोळखी माणसाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दयानंद भगवान काटे, राहणार बोपला, तालुका लातूर, यांना काही दिवसांपूर्वी एक फोन आला. “तुमच्या मुलासाठी आमच्याकडे मुलगी आहे” असे सांगून मुलगी दाखवतो म्हणून वेळोवेळी फोन येत होता. मुलासाठी मुलगी शोधणे चालू असताना दयानंद काटे यांना फोन आल्याने निरोप ऐकून दयानंद स्वतःच्या मोटरसायकलवर कवा येथे गेले.

दुपारी दीड-दोन वाजताच्या सुमारास दयानंद पोहोचले. लग्न जुळवणारा एजंट असल्याचं भासवून फोन करणारा त्यांचा सख्खा भाऊ देवानंद काटे व त्यांचा अल्पवयीन मुलगा कवा गावाजवळ चारचाकी गाडी घेऊन वाट पाहतच होते. तिथे दयानंद आणि देवानंद यांची भेट झाली. भाऊ इथे कसा काय? अशी विचारणा करताच आपली सोयरी करणारा एजंट देवानंद असल्याचं समजलं.

सख्खा भाऊ दयानंद याला उद्देशून “तू आता सापडला आता तुला सोडत नाही” असे म्हणत देवानंदने गाडीत असलेला दोरखंड घेऊन गळा आवळला व डोक्यात हातोडीने मार करून भावाचा मृतदेह तिथेच सोडून पसार झाला.

न्हा करण्यासाठी वापरला हरवलेला मोबाईल

देवानंद काटे याला काही दिवसापूर्वी धाराशिव येथे एक मोबाईल सापडला. त्या मोबाईलवरून त्याने दयानंदला फोन करून कवा गावाजवळ बोलावून घेतले व तेथे बोलावून भावाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. आपण एजंट असल्याचे सांगत देवानंद व त्याचा मुलगा या दोघांनी मिळून सख्ख्या भावाचा खून करण्याचा कट रचला. शेतीच्या बांधावरून मागील बऱ्याच वर्षापासून या दोन भावांमध्ये वाद असल्याचे यातून समोर आले आहे.

12 तासात पोलिसांनी लावला छडा

दयानंद काटे यांचा मृतदेह सापडल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद लातूर पोलिसात करण्यात आली होती, मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी सख्ख्या भावाला चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर सख्ख्या भावाने खून केल्याचे कबूल केले. मागील बऱ्याच वर्षापासून शेतीच्या वादामुळे भावाभावांमध्ये भांडणे होत होती. भांडणे विकोपाला गेल्यामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हरवलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस झाल्यामुळे हा गुन्हा उकल होण्यास मदत झाली, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी सांगितले.

शेतीच्या बांधावरून वाद

दयानंद काटे व देवानंद काटे हे दोन्ही सख्खे भाऊ. शेतीचा वाद हा मागील बऱ्याच वर्षापासून या दोघांमध्ये होत होता. देवानंद काटे याच्या डोक्यात दयानंद काटे याला वडिलांनी जमीन जास्त दिली आहे, याचा राग होता. यामुळे मागील बऱ्याच दिवसापासून दयानंद काटे यांच्या मुलीच्या लग्नासाठी बनावट एजंट म्हणून त्याच्या संपर्कात होता. गावापासून लांब अज्ञातस्थळी त्याला संपवायचा कट त्याने रचला. मुलाला मुलगी दाखवतो म्हणत निर्मनुष्य ठिकाणी बोलवून डोक्यात हातोडा घालून गळा आवळून दयानंद याचा खून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *