जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. सीमेवरील घडामोडी आणि नवी दिल्लीत सुरु असलेल्या उच्चस्तरीय बैठका पाहता भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. भारताच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून प्रत्युत्तर मिळू शकतं. त्यामुळे भारतानंही तयारी सुरु केली आहे. शहरांवर हल्ला झाल्यास नागरिकांना त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत.
युद्धाचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं देशभरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं उद्या (७ मे) रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. युद्धाच्या काळात हवाई हल्ल्याचा धोका असताना सायरन वाजवले जातात. तशाच प्रकारे उद्या सायरन वाजवला जाईल. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचायचं, ब्लॅकआऊट कसा करायचा, याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येईल.
केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. राज्य प्रशासनानं सगळ्या संबंधित यंत्रणांना अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांना प्रशासनाशी समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारनं मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणांचं तीन श्रेणीत वर्गीकरण केलं आहे.
