सेवानिवृत्त आर्थिक संकटात; बेस्टच्या ४ हजार माजी कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासूनची देणी थकली

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि रजांच्या रोखीकरणासह अन्य देणी गेल्या तीन वर्षांपासून मिळालेली नाहीत. सन २०२२नंतर चार हजारपेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकली असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही देणी त्वरित देण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.

बेस्ट उपक्रमाने २०१९पासून खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे या उद्देशाने २०१९पासून भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र, विविध प्रयोग करूनही बेस्टच्या परिवहन विभागाचे ना उत्पन्न वाढले, ना तोटा कमी झाला. २०१९मध्ये मुंबई महापालिका, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कामगार संघटनांमध्ये सामंजस्य करार झाला. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना होत्या. यात तिकीटदर दहा रुपयांवरून पाच रुपये करणे, आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेकडून दरमहा अनुदान देणे इत्यादी मुद्दे करारात होते. हा करार संपुष्टात आला आणि त्यानंतर नव्याने करार झालाच नाही. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १५० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होत आहे. असे असतानाही महापालिकेकडून बेस्टला अनुदानापोटी दर महिन्याला काही ठराविक रक्कम मिळू लागली. मात्र, ही रक्कम खूपच कमी असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्यात अडथळे येऊ लागले. तसेच कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजा साहाय्य भत्त्याची रक्कम, रजा रोखीकरणासह अन्य थकबाकी वाढू लागली.

मुंबई महापालिकेने बेस्टसाठी २०२४-२५च्या अर्थसंकल्पात ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली. बस खरेदीसह अन्य कामासाठी ही रक्कम वापरण्यात आली. यातील नवीन बस खरेदीसाठी असलेले १२८ कोटी रुपये सोडल्यास उर्वरित रक्कम बेस्टला मिळाली असली, तरीही यातून निवृत्त कर्मचाऱ्यांची पूर्णपणे देणी बेस्ट देऊ शकलेली नाही. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, यातील १०० कोटी रुपये बेस्टला मिळाले आहेत. मात्र, देणी देण्यासाठी महापालिकेकडून उर्वरित रक्कम मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रधान्याने ३० टक्के देण्यात येईल आणि ७० टक्के रकमेचे नियोजन करून तीसुद्धा तातडीने देण्यात येईल, असे गेल्या वर्षी बेस्ट कामगार सेनेसोबत झालेल्या बैठकीत बेस्टचे तत्कालीन महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्याचीही अंमलबजावणी होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोठ्या संख्येने निवृत्ती
मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होत आहेत. १ ऑगस्ट २०२२नंतर चार हजारपेक्षा जास्त बेस्ट कर्मचारी निवृत्त झाले आहेत. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना ग्रॅच्युइटीसह अन्य देणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, २०२२नंतर ४ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुमारे ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणी अद्यापही मिळालेली नाही.

ग्रॅच्युइटी कायदा १९७२ व बेस्ट वर्कर्स युनियनसोबत झालेल्या कराराचे उल्लंघन करून १ ऑगस्ट २०२२नंतर निवृत्त झालेल्या चार हजार बेस्ट कर्मचाऱ्यांची देणी अद्याप देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. बेस्ट उपक्रमाने ही देणी तातडीने द्यावीत.-शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *