एकट्या महिलेने रोखली जातपंचायत; मढीच्या यात्रेत होणार होता न्यायनिवाडा, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथील कानिफनाथ यात्रेत वैदू समाजाची जातपंचायत बसण्यापासून ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या कोमल वर्दे या एकट्या महिलेने रोखली. त्यांनी हजारोंचा समुदाय पळवून लावला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाने जातपंचायत विरोधी कायदा संमत केलेला आहे. त्यामुळे जातपंचायत बसणे, हे कायद्याने गुन्हा ठरत आहे. पूर्वी मढी येथे भटके विमुक्त समाजातील अनेक जातपंचायत भरत होत्या. मात्र, या कायद्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून जातपंचायत बसणे बंद झाले आहे. यावर्षी भटके विमुक्त समाजातील सर्वोच्च वैदू समाजाची जातपंचायत होण्यासाठी शनिवारी नारळ फुटले व रविवारी सकाळी अकरा वाजता जातपंचायत बसून काही निवाडे होणार होते. ही माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना मिळाली. त्यांनी व डॉ. टी.आर.गोराणे, ॲड. रंजना गवांदे, कोमल वर्दे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तक्रार अर्ज पाठवला. त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत मढी येथील यात्रेत जातपंचायतची पाहणी करण्यासाठी पथक पाठविले.

पथकाने अशी जातपंचायत घेता येणार नाही. शिवाय सदरचे कृत्य बेकायदेशीर आहे, याची जाणीव करून दिली. पोलिसी खाक्यामुळे मातब्बर जातपंचांनी नमते घेतले. परंतु, मेळाव्याच्या नावाखाली वैदू भाषेत त्यांनी जातपंचायत चालू ठेवली. मात्र, ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या कोमल वर्दे या नाशिकहून मढीस गेल्यावर त्यांना वैदू भाषा समजत असल्याने जातपंचायत बंद करण्यासाठी प्रयत्न केले. तसे पोलिसांच्या लक्षात आणून दिले. यामुळे पोलिस आल्याने जातपंचायतीचे लोक पळून गेले

त्यामुळे पीडित व्यक्तींनी पंचांच्या कचाट्यातून सुटल्याने आनंद व्यक्त केला. ‘अंनिस’ने पोलिसांना धन्यवाद दिले असून, या मोहिमेत पोलिस निरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर, हवालदार आदिनाथ बढे, पोलिस नायक सुकदेव धोत्रे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप आदी सहभागी झाले होते. कुणावर जातपंचायतचा अन्याय होत असल्यास ९८२२६३०३७८ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
भारतीय बापलेकीला अमेरिकेत संपवलं, ६ वर्षांपासून होते स्थायिक, एक जण अटकेत
जातपंचायत ही राज्यातील सर्वोच्च जातपंचायत आहे. ती मागे कायमची बरखास्त करण्यात आली होती. तरीही इतके दिवस छुप्या पद्धतीने चालणारी जातपंचायत उघडपणे करण्याची हिंमत पंच करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. –कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *