मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच क्षेत्रांमध्ये हिशोबाची जुळवाजुळव करण्याला प्राधान्य दिलं जातं. या साऱ्यामध्येच एकिकडे हिशोबाची सर्व गणितं अंतिम टप्प्यात असतानाच आता महिन्याच्या शेवटच्या आठव्यामध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यामुळंच अनेकांना फटका बसू शकतो. महिन्याचा चौथा आठवडा असल्यामुळं 22 तारखेचा शनिवार आणि 23 तारखेचा रविवार ही आठवडी सुट्टी असून, बँका सोमवार आणि मंगळवार अर्थात 24 – 25 मार्च रोजीसुद्धा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं बँकेतील कामं शिल्लक असल्याच ती आताच उरकून घ्या.
का बंद राहणार बँका?
आठवड्याच्या सुरुवातीलाच बँका बंद राहण्याची शक्यता असून यामागे आठवडी सुट्टी किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी असं काहीच कारण नाही. तर, बँकांचं काम या दिवसांमध्ये अल्पशा किंवा पूर्ण प्रमाणात प्रभावित होण्यामागचं कारण आहे कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप. इंडियन बँक्स असोसिएशनसोबत झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळं बँक कर्मचरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 24 आणि 25 मार्च या दोन दिवशी देशव्यापी संप पुकारला आहे.
बँकांमध्ये रिक्त जागांवरील भरतीच्या मागणीला उचलून धरत त्यासोबतच सलसरकट पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा आणि ग्रॅच्युइटी रकमेत वाढ अशा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. वरील मागण्यांना अनुसरून बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यामध्ये चर्चा सुरू असूनही त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. ज्यामुळं बँकांनी अखेर संपाचा मार्ग निवडल्याचं म्हटलं जात आहे.
केंद्राच्या आर्थिक सेवा विभागानं बँक कर्मचाऱ्यांची कामगिरी पाहून त्या आधारे त्यांना इन्सेन्टीव्ह देण्याच्या पर्यायाला बँकांनी विरोध दर्शवला असून कर्मचाऱ्यांच्या नोकरीला यामुळं धोका असल्याचं कारण पुढे करण्यात येत आहे. ज्यामुळं ही आढावा प्रक्रिया थांबवण्याची मागणी बँका करत आहेत. कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी वाढवून 25 लाखांपर्यंत करण्याची माहणीसुद्धा प्रलंबित असून ही रक्कम आयकरमुक्त करण्याची मागणीही बँक कर्मचाऱ्यांनी केली आहे. तेव्हा आता बँकांच्या या मागण्यांवर नेमका कोणता तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, बँकांच्या या दोन दिवसीय संपादरम्यान नेमक्या कोणत्या सेवा बंद राहतील याची स्पष्टोक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. असं असलं तरीही बँकेच्या कार्यवाहीवर मात्र संपामुळं परिणाम होणार ही बाब नाकारता येत नाही. ज्यामुळं बँकेज प्रत्यक्ष जाऊन आपली कामं करून घेणाऱ्या ग्राहकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा या संपावरही अनेकांचच लक्ष आहे असं म्हणणं गैर नाही.
