किमान तापमानात घट, कमाल तापमानाचा पारा चढा

गेल्या काही दिवसांत मुंबईचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी, सोमवारी आणि मंगळवारीही मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सध्या मुंबईत किमान तापमानात घट, तर कमाल तापमानाचा पारा चढा अशी स्थिती आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानातील घट कायम होती.

मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३४.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये रविवार, सोमवारी आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्यांची दिशा बदलत असल्याने, तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार आहे. ही तापमानवाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत कमाल तापमानाचा पारा चढा असताना किमान तापमानाच्या पाऱ्यात मात्र घट होत आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तापमानात घट कायम आहे. यामुळे मुंबईत सध्या पहाटे काहीसा गारवा असतो, त्यानंतर मात्र उकाडा सहन करावा लागत आहे. किमान तापमानातील ही घट अजून एखाद दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानातही वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *