जर तू टिकली लावत नसशील आणि मंगळसूत्र घालत नसशील तर तुझ्या पतीला तुझ्यात रस कशाला असेल? अशी विचारणा न्यायाधीशांनी एका विवाहित महिलेला केली आहे. विभक्त जोडप्यासाठी आयोजित समुदेशनादरम्यान सत्र न्यायाधीशांनी महिलेला ही विचारणा केली. पुण्यातील वकिलाने LinkedIn वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. पुण्यातील वकील अंकुर आर जहागीरदार यांनी लिहिलं आहे की, घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात मध्यस्थीसाठी हे जोडपे न्यायाधीशांसमोर हजर झाले होते. न्यायाधीश त्यांना वाद शांततेने सोडवण्यासाठी प्रोत्साहित करत होते. “मी पाहू शकतो की तुम्ही मंगळसूत्र घातलेलं नाही आणि टिकलीही लावलेली नाही. जर तुम्ही विवाहित महिलेसारखे वागला नाहीत तर तुमचा नवरा तुमच्यात रस का दाखवेल?” अशी विचारणा न्यायाधीशांनी महिलेला केली.

जहागीरदार म्हणाले की, न्यायाधीशांच्या बेछूट वक्तव्यांबद्दल तक्रारी करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही हे फार निराशाजनक आहे. “जिल्हा न्यायालयांमध्ये असं बरेच काही घडतं जे कोणत्याही तर्कशुद्ध विचारसरणीच्या सुशिक्षित व्यक्तीच्या विवेकाला धक्का देईल. दुर्दैवाने, मला वाटते की आपल्या समाजात काही अपमानजनक गोष्टींसाठी एक मूलभूत सहनशीलता आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

अशाच एका प्रकरणाची माहिती दिली. एका सत्र न्यायाधीशांनी त्यांच्या एका क्लायंटला थोडी लवचिकता दाखवण्यास सांगितल होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीशांनी त्यांच्या क्लायंटला सांगितले, “जर एखादी महिला चांगली कमाई करत असेल, तर ती नेहमीच तिच्यापेक्षा जास्त कमाई करणारा पती शोधेल आणि कमी कमाई करणाऱ्या व्यक्तीवर कधीही समाधान मानणार नाही. तथापि, जर चांगला कमाई करणारा पुरूष लग्न करू इच्छित असेल, तर तो घरात भांडी धुणाऱ्या मोलकरणीशीही लग्न करू शकतो. पुरुष किती लवचिक आहेत ते पहा. तुम्हीही थोडी लवचिकता दाखवली पाहिजे. इतके कठोर होऊ नका.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *