आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता स्वबळावर लढविणे, असे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाचे लक्षण आहे, असे खडे बोल महायुतीतील नेत्यांना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहेत, तर संजय राऊत यांच्या नेत्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल करावे. राऊत हे मनोरुग्ण आहेत, अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या निधनानंतर परिचारक यांच्या सांत्वनपर भेटीसाठी पाटील पंढरपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्ष राज्याचा एक निर्णय कधीच करीत नाहीत. स्थानिक पातळीवर संबंधित शहरात कोणाचे किती काम आहे, यावरून निर्णय घेतले जात असतात. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर प्रभाग रचना होईल. मगच निवडणुकांबाबत निर्णय होईल. आता बोलणे उचित नाही, असे पाटील म्हणाले. तर सांगोला उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
