मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (A1909) विमानातील प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या विमानाच्या उड्डाणाला सुमारे पाच तास उशीर झाल्याने प्रवासी विमानातच अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये विमानातील प्रवासी केबिन क्रूशी वाद घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
मिडडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, विमानाचे उड्डाण हे सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी होणार होते. पण उड्डाणासाठी तांत्रिक बिघाडामुळे त्याला चार तास ४५ मिनिटे उशीर झाला. इतका उशीर झाल्याने विमानातील प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना दुपारी एकच्या सुमारास विमानातून खाली उतरवण्यात आले.
व्हिडीओ होतोय व्हायरल
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी केबिन क्रू क्रमचाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. काहीजण आदळाआपट करताना देखील पाहायला मिळत आहेत. विमानातील प्रवासी त्यांना विमानाबाहेर जाऊ दिले जावे अशी मागणी करत होते. आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही, दरवाजा उघडा असा संवाद व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे. विमानातील कॅप्टन विमानला जॅक जोडणे आवश्यक आहे, कृपया समजून घ्या, असं उत्तर प्रवाशांना देत असल्याचे ऐकू येत आहे.
हा व्हिडीओ या विमानातून प्रवास करणाऱ्या तेजस्वी अनंदकुमार सोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एअर इंडियाच्या AI909 विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत भीषण अनुभव आला. विमान सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण करणे अपेक्षित असताना, विमानात एसी सुरू नसल्याच्या स्थितीत प्रवाशांना (लहान मुले आणि वृद्धांसह) पास तास उशिराचा सामना करावा लागला. प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि तरीही प्रवाशांनी त्यांना गेट उघडण्यास आणि खाली उतरू देण्यास भाग पाडेपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणताही मदत केली नाही”.
सोनी यांनी असाही दावा केला की प्रवाशांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कॅप्टन कॉकपिटच्या बाहेर आले नाहीत. ते म्हणाले की, “आम्हाला अत्यंत जबाबदार उद्योग समूह असलेल्या @tata_trusts च्या मालकीच्या एअर लाइनकडून ज्या प्रकारचा अनुभव अपेक्षित होता तसा अनुभव मिळाला नाही. कॅप्टन एकदाही प्रवाशांबरोबर परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी कॉकपिटमधून बाहेर आले नाहीत, ५ तास वाट पाहिल्यानंतर प्रवाशी जोपर्यंत गोंधळ घालत नाहीत तोपर्यत ते आतच शांतपणे वाट पाहात राहिले”.
