पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका अफवेमुळं बुधवारी जळगाव इथंच रेल्वे असताना भीषण संकट ओढावलं आणि यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार रेल्वेमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळं प्रवाशांनी रेल्वेची चैन ओढली आणि रुळांवर उड्या मारत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, रुळांना वळण असल्यानं समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेस या भरधाव वेगातील रेल्वेगाडीचा अंदाज न आल्यानं कैक प्रवाशांना या रेल्वेनं चिरडलं.
या भीषण अपघातामध्ये प्रवाशांचा अकाली मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीररित्या जखमीसुद्धा झाले. इथं हा रेल्वे अपघात धडकी भरवत असतानाच तिथं मुंबईतील एका भयंकर अपघाताच्या कटू आठवणींनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. 31 वर्षांपूर्वी मुंबई लोकल प्रवासादरम्यान एक अशी घटना घली ज्यामध्ये महिलांनी धाावत्या रेल्वेतून उड्या मारल्या होत्या.
फर्स्ट क्लासमधून महिलांनी मारल्या उड्या…
13 ऑक्टोबर 1993 ला ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार तेव्हा ज्या महिला फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होता तेव्हाच त्यांना अचानकच रेल्वे बोगीच्या खालून धूर येताना दिसला आणि जीव वाचवण्यासाठी काही महिलांनी चालत्या रेल्वेतूनच खाली उड्या मारल्या. या घटनेमध्ये 22 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. या दिवशी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये भयंकर पाऊसही असल्यानं धूर दिसताच महिलांमध्ये भीतीचं वातावरण होतं असं म्हटलं गेलं होतं.
पुष्पक एक्स्प्रेस अपघातात कैक बळी
पुष्पक एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची रेल्वे गाडी लखनऊ येथून मुंबईच्या दिशेनं निघाली होती. भरधाव वेगात गाडीचा प्रवास सुरू होता. बुधवारी सायंकाळी 4 वाजून 42 मिनिटं होत असतानाच ही रेल्वेगाडी जळगावमधील रेल्वेस्थानकापाशी पोहोचली असतानाच तिथं बोगी क्रमांक 4 मध्ये धूर दिसू लागल्यानं आग लागल्याची अफवा उठली. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला आणि काही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारत जीव वाचवण्याच्या हेतूनं पळ काढला. पण, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्यानं यातील अनेक प्रवाशांचा या भीषण अपघातात मृत्यू ओढावला आणि एका क्षणात रुळांवर मृतदेहांचा खच दिसला.
