सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे

जात जेवढी घट्ट कराल तसा माणूस पातळ होत जाईल, जातीचे खोटे आत्मे नष्ट झाले तरच माणूस मोठा होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.औदुंबर येथे मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या सदानंद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

डॉ. लवटे म्हणाले, औदुंबरचे साहित्य संमेलन हे सामान्य माणसांनी सामान्यांसाठी चालविलेली साहित्य चळवळ आहे. कवी सुधांशु, म. भा. भोसले यांनी साहित्य चळवळीला प्रेरणा दिली. साहित्याचे काम सर्व प्रकारच्या अंधश्रध्देचे निर्मूलन करणे हे होय. माणसात माणुसकी असावी, त्याच्यामध्ये जात असावी. समाजात काहीतरी बदल घडावा म्हणून लेखक लिहीत असतो. धर्म हा कर्तव्यांनी ठरतो. येथून पुढच्या काळात धर्मांनी नाही तर मूल्यांनी जगायला सुरुवात करावी लागेल. नदीत स्नान केल्याने मोक्ष मिळतो तर पाण्यातील म्हैस पवित्र का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या वेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री सोनाली नवांगुळ, सुभाष कवडे, प्रा.संतोष काळे, विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. भारती पाटील यांच्या अदिम दु:खाचे वर्तुळ या काव्यसंग्रहास २०२४ चा कवी सुधांशु पुरस्कार तर मन्सूर जमादार यांच्या अनुभव तरंग या काव्यसंग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी उद्योजक गिरीश चितळे, डॉ. प्रदीप पाटील, आप्पासाहेब पाटील, अंकलखोपच्या पोलीस पाटील सुनिता पाटील आदी मान्यवरांसह साहित्यिक, रसिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *