देशोदेशीच्या सीमा ओलांडून उजनी जलाशयाच्या काठावरील भादलवाडीच्या ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक या स्थलांतरित पक्ष्याचे विणीच्या हंगामासाठी आगमन झाले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर ठरलेल्या उजनीकाठच्या पंढरीत विणीच्या हंगामासाठी बाभळीच्या झाडांवर ‘सारंगार’ बसविण्याची चित्रबलाकांची लगबग सुरू झाली आहे.
दर वर्षी युरोपीय देशांतून आशिया खंडाकडे वळताना महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यातील चित्रबलाकांची आश्रयस्थाने पक्षिमित्रांना परिचित झाली आहेत. इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील जुन्या शासकीय कार्यालयांच्या गजबजाटातील जुनाट आणि उंच चिंचेच्या झाडांना या पक्ष्यांची पसंती असते. मात्र, दोन वर्षांपूर्वी इंदापूर नगरपालिकेने चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत असलेल्या चिंचेच्या झाडावरच घाव घातल्याने अनेक पक्ष्यांना त्या वेळी जीव गमवावा लागला होता.
भादलवाडी येथे दहा-बारा वर्षांपूर्वी चित्रबलाक पक्ष्यांची मोठी वसाहत होती. मात्र, त्यानंतर वेळोवेळच्या अवर्षणामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने चित्रबलाकांनी भादलवाडी तलावाकडे वसाहत करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला, की चित्रबलाकांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठ्यानजीक होते. तेथेच त्यांच्या विणीचा हंगाम पूर्ण होतो. त्यानंतर सहा महिने उजनीचा परिसर पक्ष्यांच्या किलकिलाटाने खुलून जातो. विणीच्या हंगामासाठी वसलेल्या या वसाहतींना ‘सारंगार’ म्हटले जाते. सध्या विणीच्या हंगामासाठी पक्ष्यांचे येथे आगमन झाले आहे. उजनीकाठावरच पिल्लांना उड्डाणक्षम होण्यासाठीचे प्रशिक्षण मिळते. या प्रशिक्षणाच्या सुंदर कवायती पाहणे हा पर्यावरणप्रेमी आणि पक्षिनिरीक्षकांसाठी पर्वणी ठरते.
चित्रबलाक मान्सूनचा अंदाज वर्तवितात नैऋत्य मोसमी पाऊस देशात वेळेवर येणार असेल, तर पक्ष्यांचे प्रयाण मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. यामध्ये रोहित पक्ष्यांचाही समावेश आहे. त्या पाठोपाठ चित्रबलाक पक्षीही येथील उजनीचा पाहुणचार संपवून पिलांसह प्रयाण करतात. चित्रबलाकांचे प्रयाण झाल्यानंतर पुन्हा देशात येताना मात्र त्यांची गणना परदेशी पाहुणे म्हणूनच केली जाते. त्याचे शल्य आजही पक्षिनिरीक्षक नोंदवित आहेत.
