गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीचा वेध घेत बाहेर पडू लागली आहे. काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे तर आणखी काही पदाधिकारी जाण्याच्या मार्गावर आहेत. काहीजण भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांना थांबवणारे कोणी नाही. वरिष्ठांबद्दलच असंतोष निर्माण झालेला असल्याने स्थानिक पदाधिकारीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. अलीकडच्या काळापर्यंत एकत्रित शिवसेनेचे अहिल्यानगर शहरावर वर्चस्व होते. ते आता लयाला जाताना दिसत आहे.
ठाकरे गटातून बाहेर पडताना कार्यकर्त्यांचा बराचसा ओढा शिंदे गटाकडे आहे तर काही प्रमाणात भाजपकडे आहे. दोन्ही राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा पर्याय मात्र त्यांना मान्य नाही. ठाकरे गटाचे वर्चस्व कमी होताना शहरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्व वाढलेले आहे. मात्र या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी त्यांचे परंपरागत वैमनस्य आहे. हा विरोधच त्यांचा जनाधार आहे. शरद पवार गट किंवा काँग्रेसचे शहरातील अस्तित्व तेवढे सक्षम नसल्याने हा पर्याय त्यांना मान्य होण्यासारखा नाही.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आणखी काही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी प्रवेशासाठी चर्चा केली. शहराचे राजकारण बहुतांशी महापालिकेभोवती फिरत असते. महापालिकेच्या निवडणुका नजिकच्या काळात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधारी पक्षात असल्यास आपली कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रवेशोत्सुक पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे.
शहरावर शिवसेनेने अनिल राठोड यांच्या माध्यमातून दीर्घकाळ राज्य केले. राठोड यांच्यानंतर शिवसेनेकडे एकमुखी नेतृत्व राहिले नाही. राठोड यांच्या अखेरच्या काळातच त्यांना फंदफितूरीला सामोरे जावे लागले होते. शहरात दीर्घकाळ शिवसेनेचे सर्वाधिक संख्येने नगरसेवक निवडून येत. आता तेच पक्ष सोडू लागले आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी वरिष्ठ, स्थानिक पातळीवरील नेतृत्व तयार नाही. त्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची राजकीय मनस्थिती सैरभैर झालेली आहे.
जिल्ह्यात एकत्रित शिवसेनेची सर्वाधिक ताकद शहरात होती. महापालिकेत हा पक्ष सातत्याने सत्तेत असायचा. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते शहरातील नेतृत्वाकडे आकर्षित व्हायचे. मात्र आता जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकरराव गडाख तांत्रिकदृष्ट्याच शिवसेनेत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सुर कधी जुळले नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाकडे आता नेतृत्व राहिले नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर व पारनेर मतदारसंघाच्या जागेसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही होते. परंतु त्यांना विचारात न घेता परस्पर ठाकरे गटाने श्रीगोंद्याची जागा स्वीकारून महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला अहिल्यानगर व पारनेरच्या जागा बहाल केल्या. श्रीगोंद्यातही उमेदवारी लादली गेली. या सर्व परिस्थितीचा रोष निर्माण झालेला आहे. म्हणूनच या भागातून गळतीला सुरुवात झाली आहे.
या परिस्थितीची माहिती वरिष्ठांना कळविलेली आहे. काल, शनिवारी संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी अहिल्यानगरमध्ये येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली व म्हणणे जाणून घेतले आहे. विरोधी पक्षात राहून लढाऊपणा दाखवणे प्रत्येकाला जमते असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला सत्ताधारी पक्षात असावे असे वाटते आहे. -शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट.
