मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट

मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट झाली. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा गारवा अनुभवता येणार आहे. सांताक्रूझ येथे शुक्रवारी १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानाचा पारा चढा राहिल्याने पहाटेचा गारवा नाहीसा झाला होता. मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना सध्या उकाडा सोसावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी किमान तापमानात ४ अंशानी घट झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी २१.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत येत्या काही दिवसांत चांगलाच गारवा अनुभवता येणार आहे. कमाल तापमानाच्या पाऱ्यातही शनिवारीपासून घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३० – ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे.

डिसेंबरमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रवाह मागील दोन आठवड्यांपासून खंडीत झाले होते. याचाच परिणाम म्हणून राज्यातील तापामानात चढ – उतार होत आहे. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक भागात शुक्रवारी किमान तापमानात घट झाली असून ही घट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *