बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करुन संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलं. इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचा दावाही अंजली दमानियांनी केला आहे.
राजकीय ड्रामा
बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी, “सध्या तिथे राजकीय ड्रामा सुरु झालेला आहे. संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच आहेत. ते आपआपल्या क्षेत्रात तिचं काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हस्यास्पद आहे. आम्ही हातभर चांगली माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मिक कराडला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत,” असं सांगितलं.
