त्र्यंबकेश्वर येथे जव्हार रोडवर वीटभट्टी परिसरात नीलेश परदेशी (वय ४०) या तरुणाचा शनिवारी रात्री (ता.२१) उशिरा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ पिस्तुलाच्या रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. तसेच, तरुणाला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेने त्र्यंबक शहर व परिसरात घबराट निर्माण झाली असून, घडल्या प्रकाराबाबत पोलिस अधिक माहिती देत नसल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे. मारेकऱ्यांना शोधून त्यांना जेरबंद करण्यासह शहर भयमुक्त करण्याचे आव्हान त्र्यंबक पोलिसांपुढे आहे.
मयत नीलेश हा त्र्यंबक शहरातील रहिवासी होता. जमिनीच्या वादातून त्याचा काटा काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्र्यंबक पोलिसांनी शनिवारी रात्री काही नातेवाईकांची चौकशीही केली. परंतु, विशेष काही हाती लागले नसल्याचे समजते. रविवारी दिवसभर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस ठाण्याला भेटी दिल्या. नीलेशच्या मृतदेहावर रविवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय वरदहस्त असलेल्या एका टोळीच्या दहशतीपोटी नागरिक उघडपणे बोलत नसले तरी दबक्या आवाजात मात्र चर्चा घडते आहे. मारेकऱ्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिस पेलतील काय अशीही चर्चा आहे. सिन्नरमध्ये मागील आठवड्यात माजी उपनगराध्यक्षाच्या मुलालाही अशाच पद्धतीने संपविण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने संबंधित बचावला असला तरी कायदा व सुव्यवस्था हा चिंतेचा विषय आहे.
भाविक दहशतीत
शनिवारी रात्री खूनाची घटना घडली त्याच्या दोन तास अगोदर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा तसेच त्यांचे पुत्र तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी व त्यांचे कुटुंबीय त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेले होते. त्यांच्या सुरक्षा कड्यापासून हाकेच्या अंतरावर तरुणाचा खून करून मारेकरी पसार होतात, हे सुरक्षायंत्रणांसाठी आव्हानच आहे. शिवाय अशा दहशतीमुळे भाविकांच्या वर्दळीवर परिणाम होऊ शकतो.
जमिनीच्या वादातून काढला काटा?
नीलेश परदेशीच्या खुनामागे जमिनीचा वाद असल्याचा संशय आहे. नीलेशला आजोळची जमीन मिळालेली असून, त्याने तेथे घरही बांधलेले आहे. पत्नी व मुलीसह तो शहरात वास्तव्यास होता. मुलीला शिकवणीला सोडल्यानंतर तो जमिनीकडे फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्र्यंबक परिसरात जमिनीचे वाढलेले दर आणि त्या माध्यमातून होणारी वरकमाई यामुळे धाकदडपशाही करून जमिनीवर कब्जा मिळविण्याच्या घटना घडत असतात. नीलेशच्या खुनालाही हाच कांगोरा असल्याचे समजते. आता त्याच्या मारेकऱ्यांना पकडून शहरातील कायदा-सुवस्था राखण्याचे आव्हान त्र्यंबक पोलिसांपुढे आहे.
