छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; प्रेरणादायी पर्यटनस्थळ

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. असा शूर योद्धा पुन्हा होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझून घेताना अंगावर शहारे येतात. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी येथे उभारण्यात येत आहे.

भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर उभारले जात आहे. या मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. नविन वर्षात तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पणाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराची रचना गडकोट किल्ल्यासारखी आहे. दीड एकर जागेत हे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिरा भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. या मंदिरात प्रवेश करताना भव्य दिव्य किल्ल्यात प्रवेश करत असल्यासारखे वाटते. तटबंदीच्या खाली 36 चबुतरे बांधले जात आहेत. या चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात येणार आहेत.  मंदिरात येणाऱ्या सर्वभाषिक शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास कळावा यासाठी  मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांमध्ये देखाव्याची माहिती लिहण्यात येणार आहे.

या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची सिंहासनारूढ मूर्ती साकारण्यात आली आहे.  अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांनी ही मूर्ती साकारली आहे. या मंदिराचा गाभारा सभामंडप हा परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे. हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल.  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरच नाही तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा दिली जाणार आहे. येथे शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

महाविकास आघाडीची सत्ता आली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. एवढंच नव्हे तर सुरतेतही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *