मुंबई येथे व्यवसायिक संजय पुनमिया वास्तव्यास आहेत. मिरा भाईंदरमध्ये काही विकासकांनी युएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती.या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती असा आरोप आहे. याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संजय पुनमिया यांच्याविरोधात देखील हा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास २०२१ मध्ये पुन्हा सुरू करून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनमिया यांनी केला होता. तसेच, शासनाचे खोटे पत्र तयार करून विशेष सरकारी वकिल नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता पांडे यांचा जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित असे पांडे म्हणाले.