मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रांसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. या वाहतूक कोंडीमध्येत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा आकडाही तुलनेनं मोठा होता. आता मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या या सर्व मंडळींवर वाहतूक विभाग करडी नजर ठेवणार असून, त्यांची एक चूक फक्त चालकच नव्हे, तर सहप्रवाशालाही महागात पडणार आहे.
प्रामुख्यानं दुचाकीस्वारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असून, इथून पुढं विनाहेल्मेट प्रवास केल्यास दुचाकीस्वार आणि मागं बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना हे आदेश देण्यात आले आहेत.
सक्तीच्या या आदेशांनंतर आता येत्या काळात विनाहेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, हेल्मेट सक्तीच्या या कारवाईतून पुणेकरांना मात्र तूर्तास दिलासा मिळाला आहे.
दुचाकीस्वासारमवेत सहप्रवाशावरील हेल्मेट सक्तीची कारवाई शहरासाठी नसून, महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तूर्तास तरी हा नियम लागू नाही असं इथं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरीही हेल्मेटचा जास्तीत जास्त वापरत करण्याच्या सूचनाही पुण्यात देण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतुकीदरम्यान हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर एक जानेवारीपासून वाहतूक शाखेच्या वतीनं ही कारवाई करण्यात येणार आहे, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.
