२००६ मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने ५ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या पाच दोषींचा बॉ़म्बस्फोटात थेट सहभाग होता. सरकारी वकिलांनी १२ दोषींपैकी आठ दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
११ जुलै २००६ रोजी मुंबईत पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमध्ये एकापाठोपाठ एक असे सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये तब्बल १८९ जणांनी जीव गमावला होता. तर ८१७ जण जखमी झाले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. यापैकी १२ जणांना कोर्टाने दोषी ठरवले होते. या सर्वांचा शिक्षेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने बॉम्बस्फोटात थेट सहभाग असलेल्या कमाल अन्सारी, मोहम्मद शेख, आसिफ खान, नावेद हुसेन खान आणि एहतेशाम सिद्दिकी या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली. या सर्वांनी ट्रेनमध्ये बॉ़म्ब ठेवले होते. तर डॉ. तन्वीर अहमद अन्सारी, शेख आलम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, मोहम्मद माजीद शफीक, मुझम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर अहमद शेख या सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

