ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात

अपंग आणि ८५ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे मत नोंदवून घेत आहेत. जिल्ह्यात सुमारे ९३३ नागरिकांनी गृह मतदानासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले असून त्यांच्यासाठीची निवडून प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळावा यासाठी निवडणूक विभागाच्या माध्यमातून विविध जनजागृतीच्या उपायोजना राबविण्यात येत असतात. तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक यांच्यासाठी मतदानाच्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपंग आणि ८५ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ही गृहमतदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. जिल्ह्यात अपंग आणि ८५ वर्षांवरील नागरिक असे ९५ हजार १२५ मतदार आहेत. यापैकी जिल्ह्यात सुमारे ९३३ नागरिकांनी गृह मतदानासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते. या अर्ज केलेल्या नागरिकांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नागरिकांसाठीचे जिल्ह्यात आजपासून मतदान सुरु झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दिवस ठरवून देण्यात आला असून त्यानुसार मतदारांच्या घरी जाऊन मतदान नोंदवून घेतले जात आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाचे पथक नागरिकांच्या घरी जाऊन मतदान नोंदवून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *