मंत्रालयात ‘बिस्लेरी’चा पूर

मंत्रालयात ‘बिस्लेरी’चा पूर

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतांश गावांना दुष्काळाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत असून, अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरही उपलब्ध होत नसल्याची स्थानिक लोकांची तक्रार आहे. तथापि, मंत्रालयातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि सचिवांनी गेल्या पाच महिन्यात ४ लाख ६६ हजार रुपयांच्या ‘बिस्लेरी’ कंपनीच्या बाटलीबंद पाण्याने स्वतःची तहान भागवल्याचे उघड झाले आहे. मुंबई महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा उत्तम असून, या स्वस्त पाण्याऐवजी राज्यातील फडणवीस सरकारने केलेल्या बाटलीबंद पाण्याच्या उधळपट्टीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयद्वारे ही माहिती मिळवली. राज्याच्या अनेक भागात पिण्यासाठी पाण्याच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून, मंत्रालयातील बाटलीबंद पाण्यासाठी लाखोंची उधळपट्टी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. ‘हे सरकार नाजूक लोकांचे असून, सामान्य जनता जे पाणी पिते, ते पाणी सरकारमधील लोकांना चालत नसावे. अशा सरकारला आता जनताच पाणी पाजेल’, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी मंत्रालयात वापरण्यात येणाऱ्या ‘बिस्लेरी’ पाण्यासाठी अदा केलेले शुल्काची माहिती मागितली होती. पालिकेचे पाणी दर्जेदार, स्वच्छ असून, त्याचा वापर करण्याचे आदेश द्यावे. ज्या मंत्र्यास किंवा सचिवास ‘बिस्लेरी’चे पाणी हवे आहे त्यांनी स्वतः तो खर्च उचलावा, अशी मागणी गलगली यांनी केली.

डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या पाच महिन्यांत मंत्रालयात ८३ हजार ६२८ ‘बिस्लेरी’ बाटल्यांचा पुरवठा झाला. त्यांची एकूण किंमत चार लाख ६६ हजार १९ रु. आहे.

यात सर्वाधिक २५० मिली ‘बिस्लेरी’ची संख्या ६८ हजार ९७६ आहे. ज्यावर तीन लाख ६७ हजार ६४२ रु. खर्च झाले.

१४ हजार ४९६ ‘बिस्लेरी’ बाटल्या ५०० मिलीच्या असून, त्यावर सरकारने ९६ हजार ६८८ रु. ३२ पैसे खर्च केले.

एक लिटरच्या ‘बिस्लेरी’ बाटल्या फक्त १५६ वापरल्या गेल्या असून, त्यांची किंमत एक हजार ६८९ रु. ४८ पैसे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *