अद्याप ओसरलं नाही ‘दाना’ चक्रीवादळाचं सावट?

 यंदा निर्धारित वेळापेक्षा काहीसा आधीच राज्यात धडकलेला मान्सून आता मात्र राज्याचा निरोप घातना दिसला. असलं तरीही पूर्वोत्तर मान्सूनची माघार म्हणजे महाराष्ट्रातील पावसाचा निरोप असं म्हणणं योग्य नसेल. कारण, अद्यापही मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकणातही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे.

कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बहुतांश भागांमध्ये शेतांमधील पिकं आता कापणीसाठी तयार असतानाच पावसाची हजेरी मात्र अडचणींमध्ये भर टाकताना गिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात फारसा बदल होणार नसून, दिवसभर ऊन आणि सायंकाळनंतर पावसाची शक्यता बहुतांश भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे.

एकिकडे हलक्या पावसाची शक्यता असतानाच येत्या काळात मात्र हा पाऊस खऱ्य़ा अर्थी उघडीप देणार असून, त्यानंतरच थंडीचा राज्यात प्रवेश होणार आहे. सातारा, सांगलीसह विदर्भातही पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गुलाबी थंडीची सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. दरम्यानच्या काळात किमान आणि कमाल तापमानात चढ – उतार होण्याचीही चिन्हं आहेत.

दाना चक्रीवादळाचे महाराष्ट्राच्या थंडीवर परिणाम? 

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेनं पुढे येणारं ‘दाना’ चक्रीवादळ आता लँडफॉलसमयी आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देत हवामान विभागानं सर्वांनाच सतर्क केलं आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किमी इतका असून, यामुळं किनारपट्टी भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय ओडिशापासून प. बंगालपर्यंत पावसाची जोरदार हजेरीसुद्धा असेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रावर या वादळाचा थेट परिणाम होणार नसून, राज्यात येऊ घातलेल्या हिवाळ्यावर , गुलाबी थंडीवरही वादळाची वक्रदृष्टी नाही हेच आता स्पष्ट होत आहे.

चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असा स्पष्ट इशारा असल्यामुळं सध्या या भागात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रत्येक गोष्टीवर लक्ष देताना दिसत आहे. तिथं दक्षिण भारतामध्येही तामिळनाडूतील किनारपट्टी क्षेत्र काही अंशी वादळामुळं प्रभावित होऊ शकतं, पण याचीची शक्यता कमीच.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *