अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी (२२ ऑक्टोबर) संध्याकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. ऋतुजा गणेश जंगम असं या महिलेचे नाव असून ती कर्जतची राहणारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा मध्य रेल्वेवरील लोकलच्या गर्दीचा प्रश्न समोर आला आहे.
मध्य रेल्वेवरील लोकलच्या गर्दीचा प्रश्न अत्यंत भीषण झाला आहे. पिक अवर्स असेल किंवा अगदी पहाटे ५-६ ची वेळ असो मध्य रेल्वेवर गर्दी पाहायला मिळत आहेत. त्यातच संध्याकाळच्या वेळी ही गर्दी आणखी वाढत जाते. परिस्थिती अशी असते की गाडीत चढायला मिळत नाही, कसंबसं चढलं तरी अनेकजण दारातच अडकून पडतात कारण गाडीत पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे अनेकांना या प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागतो. असंच ऋतुजासोबत घडलं.
ऋतुजाने ठाण्यावरुन गाडी पकडली. पण, गर्दी इतकी होती की ती आत जाऊ शकली नाही. त्यात ती अंबरनाथला गाडीतून उतरली आणि पुन्हा गाडीत चढली. पण, गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने तिचा हात सुटला आणि ती गाडीतून पडली. यादरम्यान जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
ऋतुजा ही ठाण्याला एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती, अशी माहिती आहे. मंगळवारी रात्री ठाण्याहून तिने कर्जत ट्रेन पकडली. यावेळी अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीमुळे ती खाली उतरली आणि पुन्हा ट्रेनमध्ये चढली. पण, गर्दी इतकी प्रचंड होती की तिला आत जाताच आलं नाही. त्यामुळे ती दारात उभी राहिली. अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर तिचा हात सुटला आणि तोल जाऊन ती गाडीतून खाली पडली.
त्यानंतर या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋतुजाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. या घटनेने मध्य रेल्वेवरील लोकलच्या गर्दीचा प्रश्न किती भीषण आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून प्रवाशांनी गर्दीतून प्रवास करत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
