केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांसाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले, तरी अद्याप कुठेच सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाही. तर, व्यापाऱ्यांकडून ३ हजार ७०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत असून, ही लूटच सुरू असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आहे.
केंद्राने कृषिमूल्य आयोगामार्फत सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव निश्चित करून ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ताबडतोब कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कराड, तसेच कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीला १२ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन हमीभाव केंद्र सुरू करून, बाजार समिती आवार, तसेच तालुक्यातील परवानाधारक खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
