मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, ‘रतन तू कायम माझ्या..’

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी मध्यरात्रीनंतर टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले. रतन टाटांनी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाल्यानंतर मुकेश अंबानींनी आपल्या भावना व्यक्त करताना रतन टाटांचं निधन होणं हे भारताचं मोठं नुकसान आहे, असं म्हटलं आहे. “आजचा दिवस हा भारतासाठी आणि भारतीय उद्योग जगतासाठी फार दु:खद दिवस आहे. रतन टाटांचं निधन होणं हा केवळ टाटा समुहासाठी नाही तर प्रत्येक भारतीयाचं फार मोठं नुकसान आहे,” असं मुकेश अंबांनींनी म्हटलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुकेश अंबानींच्या नावाने शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असा उल्लेख आहे.

मी मित्र गमावला

“वैयक्तिक स्तरावर रतन टाटा यांचं निधन ही माझ्यासाठी फार खेदजनक गोष्ट असून मी एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा मी संवाद साधला तेव्हा मला प्रेरणा मिळाली. त्यांच्यासोबतच्या प्रत्येक संवादामधून ऊर्जा तर मिळालीच पण त्यामधून त्यांच्या व्यक्तीमत्वातील गुणवैशिष्ट्ये आणि स्वभावाची छाप ते पाडायचे,” असं मुकेश अंबांनींनी म्हटलं आहे. “रतन टाटा हे दूरदृष्टी असणारे उद्योजक आणि समाजसेवक होते. त्यांनी कायमच समाजाच्या उद्धारासाठी काम केलं,” असंही मुकेश अंबानींनी म्हटलं आहे.

उद्योग 70 पटीने वाढवला

“रतन टाटांच्या निधानाने भारत मातेने तिचा सर्वात यशस्वी आणि निर्मळ मनाचा पुत्र गमावला आहे. रतन टाटा हे भारताला जगासमोर घेऊन केले आणि त्यांनी जगभरातील सर्वोत्तम गोष्टी भारतात आणल्या. त्यांनी हाऊस ऑफ टाटाला संस्थात्मक आकार दिला. त्या माध्यमातून त्यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर टाटा समुहाचा विस्तार केला. 1991 साली त्यांनी अध्यक्षपद स्वीकारताना टाटा समुहाचा पसारा जेवढा होता त्याच्या 70 पट अधिक विस्तार रतन टाटांनी केला,” असं मुकेश अंबानींनी रतन टाटांच्या कामाचा गौरव करताना म्हटलं आहे. मुकेश अंबानी रतन टाटांच्या निधनानंतर मध्यरात्रीच ब्रीच कॅण्डीला पोहोचले.

सहृदय दद्भावना

“संपूर्ण रिलायन्स, निता आणि अंबानी कुटुंबाकडून मी टाटा कुटुंबाच्या सदस्यांनांना तसेच टाटा समुहाप्रती सहृदय दद्भावना व्यक्त करतो,” असं मुकेश अंबानींनी म्हटलं आहे. ‘रतन तू कायम माझ्या हृदयामध्ये राहशील,’ असं मुकेश अंबानींनी आपल्या या शोक संदेशाच्या शेवटी म्हटलं आहे. ‘ओम शांती’ म्हणत त्यांनी पोस्टची शेवट केली आहे.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी वरळी येथील पारशी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *