गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, कुलाबा, शिवाजी पार्कही आणि सीएसएमटी स्टेशन… ही ठिकाणं म्हणजे मुंबईची शान. पण येत्या काही वर्षांत हे सगळं पाण्याखाली जाणार आहे. मुंबई बुडणार आहे… जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय. बर्फ वितळण्याचा वेग असाच कायम राहिल्यास समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळं 2050 पर्यंत मुंबईला जलसमाधी मिळेल असा अंदाज कोऑर्डिनेटर डायना लोनेस्को या संस्थेनं वर्तवलाय.
या संस्थेच्या माहितीनुसार मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, मलबार हिल, दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर आणि वर्सोवा समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे. जवळपास निम्मी मुंबई समुद्र गिळून टाकणार आहे. हा धोका फक्त मुंबईसाठीच नाही. तर मुंबईजवळच्या ठाणे, आणि नवी मुंबईलाही असणार आहे. मुंबईतले अनेक भाग समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आलीय. त्यातच तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढतेय. ही वाढ अशीच राहिली तर मुंबई पाण्याखाली जाईल. गेल्या काही वर्षात शिवाजी पार्क परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी घुसतंय. हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. ज्या माणसांनी मुंबई तयार केली त्याच माणसाच्या वारसदारांमुळे मुंबई कायमची पाण्याखाली जाणार आहे.
मुंबई आणि कोलकातासह भारतातील आणखी काही शहरांना समुद्रामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरांचा धोकादायक यादीत समावेश आहे. 2050 पर्यंत समुद्र पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या 10 देशांच्या लोकसंख्येवर याचा प्रभाव होणार आहे. सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे. फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांना समुद्राचा धोका. बांगलादेशातील 2.5 कोटी, चीनचे 2 कोटी आणि फिलिपाइन्सचे सुमारे 1.5 कोटी लोक यामुळे धोक्यात येणार आहेत.
हवामान बदलामुळे आतापर्यंत जगातील पाच शहरे समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. इजिप्तमधील थॉनिस हेराक्लियन शहर, इटलीचे बाया शहर, इंग्लंडमधील डरवेंट गाव, जमैकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिनामधील विला अपेक्युएन क्षेत्र ही पाच शहरे समुद्रात बुडाली आहेत.
