सर्वपित्री अमावस्येच्या विधीमुळे यंदाही बाणगंगा तलावात मृत माशांचा खच, पालिकेचे प्रयत्न तोकडे

मुंबई महानगरपालिकेने ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला असून बाणगंगा तलाव पुन्हा एकदा दूषित झाला आहे. पितृपक्ष आणि सर्वपित्री अमावस्येनिमित्त करण्यात येणाऱ्या विधींमुळे यावर्षीही तलावातील मासे मृत झाले आहेत. तलावात मृत माशांचा खच पडला आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक असा बाणगंगा तलाव व परिसराचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामासाठी १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे काम सुरू असताना पितृपक्ष पंधरवडा व विशेषत: सर्वपित्री अमावस्येनिमित्त करण्यात आलेल्या विधींमुळे तलावातील पाणी दूषित झाले असून तलावातील मासे मृत झाले आहेत. सर्वपित्री अमावस्येनंतर गुरुवारी या तलावात मोठ्या संख्येने मृत मासे तरंगताना दिसत होते. बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम सध्या बंद आहे. प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना कंत्राटदाराने पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे कंत्राटदाराकडून काम काढून घेण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करेपर्यंत सध्या काम ठप्प आहे.

कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात आली असली, तरी बाणगंगा तलावात पितृपक्षानिमित्त विधी करण्यासाठी आलेल्यांनी तलावाचे नुकसान केले आहे. दरवर्षी या काळात तलावातील मासे मरतात. यंदा मात्र पालिका प्रशासनाने तलावासाठी वायूविजन व्यवस्था केली होती, तसेच पूजाविधीचे साहित्य गोळा करणारे एक यंत्रही तलावात सोडले होते. मात्र पालिका प्रशासनाचे सगळेच प्रयत्न तोकडे पडले आहेत. दरवर्षी बाणगंगा तलावाकाठी विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र गेल्या काही वर्षात तलावाची लोकप्रियता वाढली असून दिवसेंदिवस विधी करायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हल्ली अस्थि विसर्जनासाठीही नागरिक तलावकाठी येत आहेत. मात्र या तलावात वाहते पाणी नसल्यामुळे भाविकांनी पुजेचे साहित्य निर्माल्या कलशात अर्पण करावे, असे आवाहन करण्यात येते, असे बाणगंगा येथील रहिवासी संदीप दुबे यांनी सांगितले. या परिसरातील माजी नगरसेवक अनिल सिंह यांनी बाणगंगा तलावाच्या जवळच असलेल्या रामकुंडमध्ये पूजा विधीची सोय करण्याची व रामकुंडमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेली जुनी व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र प्रकल्पाचेच काम बंद झाले आहे. परिणामी, रामकुंडाचे कामही बंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *