सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात मृगाच्या पावसाने चांगली साथ दिल्यामुळे सरासरीच्या जवळपास तिप्पट प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती. पुरेशा पावसामुळे बहरलेल्या सोयाबीनमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असताना पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः बार्शी तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र ४७ हजार ६७ हेक्टर होते. पोषक पाऊसमानामुळे बार्शीसह दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आदी तालुक्यांत सोयाबीनची लागवड सुमारे एक लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात झाली. एकट्या बार्शी तालुक्यात ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पेरा झालेले सोयाबीन बहरले आहे. जून-जुलैच्या सुरुवातीला लागवड केलेले सोयाबीनच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
