मुंबईत यंदा पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडला. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत सुमारे अडीच हजार मिमी पाऊस पडतो. या वार्षिक सरासरीचा विचार करता यंदा आतापर्यंत मुंबईत शहर आणि उपनगरांत एकूण १०२.४५ टक्के पाऊस पडला. दरम्यान, मुंबईत बुधवारी संध्याकाळी पडलेल्या परतीच्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. त्यामुळे मुंबईत पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी संध्याकाळपासून पडलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधा उडविली. मुंबई सुमारे १० ठिकाणी घराचा भाग पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोकल ठप्प झाल्यामुळे घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. कुर्ला परिसरात तीन फूट पाणी साचले होते. बुधवारच्या पावसामुळे पालिकेच्या नियोजनावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.
पालिका आयुक्तांचे पाहणी करण्याचे निर्देश
शहरात पाणी साचल्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली व पाणी साचण्याची कारणे शोधण्याचे निर्देश दिले. येत्या दोन- तीन दिवसांत पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाणी का साचले, पाण्याची पातळी किती होती याचा अभ्यास करून कारणे शोधावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. यावेळी पाणी साचण्याची काही नवीन ठिकाणे आढळली असतील, तर तेथे अशी परिस्थिती का उद्भवली याचा अभ्यास करावा आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील हे तपासावे, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
‘मुंबई ठप्प झाली तेव्हा, मुख्यमंत्री, पालकमंत्री कुठे होते ?’
परतीच्या पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याला झोडपून काढले, मात्र अर्ध्या तासाच्या पावसात मुंबई पाण्याखाली जाऊन रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री तसेच मुंबईचे दोन्ही पालकमंत्री कुठे होते, असा सवाल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
