विमानात बॅग ठेवण्यापूर्वी रसायनाने घेतला पेट, मोठी दुर्घटना टळली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. विमानात ठेवण्याआधीच ज्वलनशील पदार्थ असलेल्या बॅगेने पेट घेतला. याप्रकरणी एका प्रवाशासह पाच जणांना अटक करण्यात आली असून सुरक्षेत कशी चूक झाली याबाबतचीही तपासणी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगेत हायड्रोजन स्पिरीट होते. रसायन असलेली बॅग तपासणीसाठी न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. कांगोमधील एका व्यक्तीने हे रसायन घेऊन येण्यास सांगितल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केल्याची माहिती उपायुक्त (परिमंडळ-८) दिक्षित गेदाम यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (टर्मिनल-२) शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इथोपियन एअरलाईन्सचे प्रवाशी विमान क्र. ईटी-६४१ अदिस अबाबा येथे जात होती. त्यावेळी प्रवासी समीर नारायण बिश्वास (३२) याने विमानात ठेवण्यासाठी जमा केलेल्या बॅगेने पेट घेतला. विमानात बॅग ठेवण्याआधीच बॅगेने पेट घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तात्काळ ही आग विझवण्यात आली. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ समीरला विमानातून उतरवून त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने साथीदार नवीन शर्मा, बिश्वुभाई उर्फ विश्वनाथ बालासुब्रमनी सेंगुतर, नंदन यादव व अखिलेश यादव यांच्या मदतीने रसायन मिळवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ या सर्वांना अटक केली. याप्रकरणी इथोपियन एअरलाईन्सचे व्यवस्थापक राकेश वाकळे यांच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलम १२५, ३२७, ६१ (२) नागरी विमान वाहतूक कायदा कलम ३ (१) (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला आरोपी समीर याला कांगोमध्ये व्यवस्थापकपदी नोकरी मिळाली होती. त्यामुळे तो इथोपियावरून कांगोला जाणार होता. कांगो येथील नवीन शर्मा याने मुंबईतून येताना एक बॅग आणण्यास सांगितली होती. अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या नंदन यादवने ती बॅग समीरला विमानतळाबाहेर सुपूर्त केली होती. चौकशीत नंदन यादवला आरोपी सुरेश सिंह याने ती बॅग दिली होती. सुरेशचा ए. एस. लॉजिस्टीक नावाने व्यवसाय असून अटक आरोपी विश्वनाथ सेंजुनधरने रसायन दिले होते. कांगो येथील आरोपी नवीन शर्मा याच्या सांगण्यावरून विश्वनाथने रसायन सुरेश सिंहला दिले होते. नंदन यादवला ज्वलनशील पदार्थ विमानतळापर्यंत नेण्यासाठी अखिलेश यादव (२८) याने मदत केली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करून शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात कांगोत राहणाऱ्या नवीन शर्मा यालाही आरोपी करण्यात आले आहे.

सुरक्षेत चूक कुठे झाली

जगातील महत्त्वाच्या विमानतळापैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाच्या आत ज्वलनशील पदार्थ कसे गेले, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. त्याबाबत आरोपींची चौकशी करण्यात येणार असून सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येणार आहे. ट्रॉलीमधील बॅगेने पेट घेतला. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. त्यावेळी विमानात सुमारे २०० प्रवासी बसले होते. आरोपी समीर स्वतः या विमानात बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *