बारामती लोकसभा मतदरासंघामधून सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची चूक आपण केल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिली. अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच त्यांचे पुतणे तसेच शरद पवार गटाच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला आहे. सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय अजित पवारांचा असूच शकत नाही असं म्हणत या निर्णयामागे गुजरात कनेक्श आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांना मुलाखतीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सर्वच बहिणी लाडक्या असल्याचं म्हटलं. “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली,” अशी कबुली अजित पवारांनी दिली. “मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं,” असं अजित पवार मुलाखतीत म्हणाले.
रोहित पवार म्हणतात तो निर्णय अजित पवारांचा नव्हताच, त्यामागे…
“खासदार सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली. मात्र तुमचे मित्रपक्ष उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे,” असं रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एक क्षमता नेता बळीचा बकरा ठरला
“दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना (शरद पवारांना) सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील,” असंही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे,” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
आता अजित पवार गट रोहित पवारांच्या “विधानसभेला ‘असाच (बारामतीमध्ये उमेदवार दिला तसाच) दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे,” या दाव्यावर काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
