कल्याण पूर्व भागात असलेल्या आयडियल शाळेतील एका विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. शाळेतल्या एका शिक्षिकेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचललं असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो असं या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या बारा वर्षांचा होता. आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी विघ्नेशने लिहिली आहे. त्यामध्ये त्याने भावनिक ओळी लिहिल्या आहेत तसंच शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचंही म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
विघ्नेश पात्रो हा आपल्या कुटुंबासह कल्याणमधील चिकणीपाडा या परिसरात वास्तव्याला होता. विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रा हे रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने घरात गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. वडील घरी आल्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच आतून प्रतिसाद मिळाला नाही. घराची खिडकी उघडून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह दिसला. हे दृश्य पाहून वडिलांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक जमले घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उशीर खूप झाला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली.
