ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विजय कदम यांनी नाट्यसृष्टीमध्येही बरेच काम केलं. मराठी नाट्यसृष्टीसाठी सतत झटणाऱ्या आणि वेगवेगळ्या कारणांसाठी कायम पुढाकार घेत नाटक आणि नाटकांशीसंबंधीत व्यक्तींसाठी झटणाऱ्यांमध्ये विजय कदम आघाडीवर होते. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीने एक सच्चा पाईक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विजय कदम यांच्या निधनाच्या वृत्ताला ज्येष्ट चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी दुजोरा दिला आहे. दुपारी दोन वाजता अंधेरीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत.
नाटक आणि मालिकांमधूनही काम
‘टूरटूर’, ‘सही दे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून विजय कदम यांनी कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. मराठी चित्रपटांमध्ये 1980 ते 1990 दरम्यानच्या दशकात विजय कदम यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. अनेक मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. काही काळापूर्वी त्यांनी ‘ती परत आलीये’ या मालिकेत ‘बाबुराव तांडेल’ ही व्यक्तिरेखा साकारली होती.
