पंढरीतील पुराचा धोका टळला; पाणी ओसरू लागले

येथील भीमा नदीच्या पात्रात पाण्याची आवक हजारावर आली आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता भीमा नदीत ८९ हजार क्युसेक पाणी वाहत आहे. विशेष म्हणजे धोक्याच्या पातळीपेक्षा पाण्याची पातळी कमी झाली आहे. उजनी धरणातून दुपारी तीन वाजता ४० हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. तर वीर धरणातून ५८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीत येणारी आवक घटत चालली असून पाण्याची पातळी कमी होत आहे. अद्याप वाळवंटातील सर्व मंदिरे व घाट पाण्याखाली आहेत. पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर त्या ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने कामे त्वरित सुरू केल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे.

गेली दोन दिवस पुण्यातील पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पुण्यातून येणारी पाण्याची आवक कमी झाली. परिणामी येथील भीमा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाले. मात्र दुसरीकडे उजनी धरण १०७ टक्के भरले आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. या आधी उजनीतून लाखो क्युसेक पाणी सोडले जात होते. ते आता बुधवारी दुपारी ३ वाजता ४० हजार क्युसेकने सोडण्यात आले आहे. तर दुसरीकडे वीर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वीर धरणातून ५८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीत दुपारी ३ वाजता ८९ हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. पाणी उतरण्याचा वेग कमी आहे.

शहरातील नदीकाठच्या झोपडपट्टीत शिरलेले पाणी ओसरू लागले आहे. पालिकेने तातडीने त्या ठिकाणी साठलेला गाळ, कचरा उचलण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच ‘डीडीटी पावडर’, फवारणी सुरू केल्याची माहिती पालिकेचे उप मुख्याधिकारी ॲड. सुनील वाळूजकर यांनी दिली आहे. सद्यपरिस्थितीत भीमा नदीची धोक्याच्या पातळीपेक्षा कमी पाण्याची पातळी झाली आहे. त्यामुळे पुराचा धोका टळला असला तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *