कोयनेसह अन्य जलाशयातून जलविसर्ग बंद; पूरभय टळले, पश्चिम घाटातील पाऊस ओसरला

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना धरणाच्या पाणलोटातील पावसाचा जोर पुरता ओसरला असून, कोयनेसह अन्य जलाशयातून जलसाठा नियंत्रणासाठी नदीपात्रात होणारा जलविसर्ग बंद करण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठे स्थिरावताना, नद्या पूरस्थितीतून बाहेर पडत असल्याने पूरभय टळले आहे.

कोयना धरणाचे साडेदहा फुटांवर उघडण्यात आलेले दरवाजे कालपासून टप्याटप्याने कमी करून आता पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कृष्णा– कोयना नद्यांची पाणीपातळी गतीने घटू लागली आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरचा पुराचा विळखा सुटला आहे.

कोयना धरणासाठा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ८६.३४ टीएमसी (८२.०३ टक्के) झाला आहे. तुलनेत हा जलसाठा अतिशय समाधानकारक असून, अशीच स्थिती पश्चिम घाटक्षेत्रातील अन्य धरणसाठ्यांची दिसते आहे. आज दिवसभरात कोयनेच्या पाणलोटात केवळ १२.३३ मिलीमीटर तर, आजवर एकूण ४,५६९.३३ मिलीमीटर (एकूण सरासरीच्या ९१.३८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *