शीव उड्डाणपुलावरील वाहतूक बंद, प्रवासाचा वेळ वाढला

मध्य रेल्वेवरील शीव येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचे पाडकाम केले जाणार असून त्यासाठी गुरुवारपासून हा पूल सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक ही धारावीतून वळवण्यात आली. या नव्या वळणामुळे प्रवासाचा अर्धा तास वाढला असून त्यामुळे पालक-विद्यार्थी, नोकरदार वर्गाला प्रवास करताना जास्त वेळ खर्ची करावा लागत आहे.

शीव स्थानकाजवळील ११२ वर्षांहून अधिक जुना उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेद्वारे या पुलाची पुनर्बांधणी केली जाईल. सध्या हा पूल बंद केल्याने, एलबीएसहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग गाठण्यासाठी वाहनचालकांना अर्धा तास अधिक खर्ची करावा लागतो आहे. गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

४११ क्रमांकाची बेस्ट बस वडाळा ते चांदिवली या अंतरावरील दोन्ही फेऱ्या तीन तासांत पूर्ण करते. मात्र, शुक्रवारी सकाळी दोन्ही फेऱ्या पूर्ण करण्यास साडेचार तास लागले. जास्तीचा दिड तास लागला. तर, पालक-विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, घरातून लवकर निघावे लागले. दरम्यान सध्या वाहनांसाठी पूल बंद करण्यात आला असून, पादचाऱ्यांसाठी खुला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *