ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छिमार यंदा १५ ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीला सुरुवात करणार आहेत. तसा निर्णय नुकताच मच्छिमार संघटनांकडून सर्वानुमते घेण्यात आला आहे. दरवर्षी १ ऑगस्टला मासेमारी हंगामाला सुरुवात होते. परंतु, सुरुवातीचा हंगाम विविध कारणास्तव वाया जात असल्याने तो पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. त्यावर सरकारकडून कार्यवाही न झाल्याने मच्छिमारांनी त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतला आहे.
देशभरात दरवर्षी १ जूनपासून पुढे ६१ दिवस समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातली जाते. माशांच्या हा प्रजनन काळ असल्यामुळे त्यांची वाढ होण्याआधीच ते जाळ्यात पकडले जाण्याची शक्यता असते. त्याचा समुद्राच्या तळाशी असणाऱ्या जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून ही बंदी केंद्र सरकारकडून घेतली जाते. त्यानंतर १ ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होतो.
मात्र, हंगामाच्या सुरुवातीचे अनेक दिवस मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येत नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांपासून ऑगस्टमध्ये येणाऱ्या वादळामुळे समुद्र खवळलेला असणे, झारखंड, मध्य प्रदेश व इतर राज्यातील मूळ गावी परतलेले खलाशी पुन्हा न परतणे आदी करणे आहेत. माशांच्या वाढीसाठी काही दिवस देणे आवश्यक असल्याचे सांगत, बंदीचा कालावधी किमान ७५ दिवसांचा असायला हवा, असे मत काही मच्छिमारांकडून व्यक्त केले जात होते.
या पार्श्वभूमीवर मच्छिमार संघटनांकडून मासेमारी बंदीचा कालावधी १५ जून, तर नवीन हंगाम १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात असली, तरी त्याची दखल सरकारकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटनांनी स्वतः पुढाकार घेत, यंदा १५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांकडून उत्तनमध्ये झालेल्या मंगळवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर, पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांकडून पूर्वीच निर्णय घेण्यात आला असल्याचे मच्छिमार कृती समितीच्या विजय थाटू यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर मच्छिमार संघटनांकडून मासेमारी बंदीचा कालावधी १५ जून, तर नवीन हंगाम १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात असली, तरी त्याची दखल सरकारकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटनांनी स्वतः पुढाकार घेत, यंदा १५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांकडून उत्तनमध्ये झालेल्या मंगळवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर, पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांकडून पूर्वीच निर्णय घेण्यात आला असल्याचे मच्छिमार कृती समितीच्या विजय थाटू यांनी सांगितले.
