घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प वादात, घोडबंदरवासियांचा प्रकल्पास विरोध

घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचा निर्णय घेऊन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. परंतु या प्रकल्पामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त करत घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. तसेच सेवा रस्त्याखाली असलेल्या मल, जल, विद्युत आणि महानगर गॅसच्या सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याऐवजी त्यावरच गटारांची उभारणी करण्यात येत असल्याचा दावा करत कोणत्याही नियोजनाविनाच सुरु असलेला या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा, असा सुर रहिवाशांनी लावला आहे. यामुळे हा प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

घोडबंदर मार्गावरून गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गावरूनच वाहतूक करतात. या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असून यामुळे येथेही कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी घोडबंदर मार्गाचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडून चार-चार अशा एकूण आठ मार्गिकांचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही महिन्यांपुर्वी घेतला. या निर्णयानुसार प्राधिकरणाने कंत्राटदार नेमून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. यासाठी घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाघबीळ पासून ते आनंदनगरपर्यंतच्या सेवा रस्त्यावर गटार बांधणीची कामे करण्यात येत आहेत.

या कामामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याचबरोबर या गटारांच्या स्लॅबवर वाहने उभी केली जात आहेत. असे असतानाच, घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध करत त्यास स्थगिती देण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात कावेसर येथील ललानी रेसीडेन्सी संकुलातील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. यापूर्वी उबाठाचे ओवळा-माजिवडा विधान सभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ आता नागरिकांनी हा प्रकल्प नकोच असा सुर लावला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादात साडण्याची चिन्हे आहेत.

नागरिकांचे काय म्हणतात..

घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबविण्यापुर्वी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात आलेले नसून त्याचबरोबर कोणत्याही नियोजनाविनाच हा प्रकल्प राबविला जात आहे. सेवा रस्त्यांवर यापुर्वी विद्युत, मल, जल आणि महानगर गॅसच्या वाहिन्या गेल्या आहेत. सेवा रस्त्यावर गटारांची बांधणी करताना या वाहिन्या स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यावर गटारांची उभारणी केली आहे. यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याबरोबर जल वाहीनीत सांडपाणी जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच मुख्य आणि सेवा रस्ता जोडल्यास अवजड वाहनांना प्रवास वेगाने होईल आणि यामुळे संकुलातून बाहेर पडताना अपघात होतील. त्यामुळे प्रकल्पास आमचा विरोध असून शासनाने या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे ललानी रेसीडेन्सी संकुलाचे अध्यक्ष रामास्वामी यांनी सांगितले. तर, सेवा रस्त्यालगत आमच्यासारखी अनेक गृहसंकुले आहेत. या संकुलाचे प्रवेशद्वार सेवा रस्त्यावर आहेत. या संकुलांमध्ये शेकडो नागरिक राहतात. तसेच या भागात अनेक शाळाही आहेत.

घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडले तर, अवजड वाहतूकीमुळे अपघात होतील. त्यामुळे या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, असे संकुलातील रहिवाशी वर्षा मुडीया आणि अरुंधती वाधवा यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार महामार्गालगतच्या गृहसंकुलांसमोर सेवा रस्ता बंधनकारक आहे. हा नियम सरळसरळ पायदळी तुडविला जात आहे. तसेच या प्रकल्पात अनेक झाडेही बाधित होणार असून यामुळे पर्यावरणाही बिघडणार आहे. या कामाबाबत पालिका अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही. या प्रकल्पामुळे अपघातांची भिती आहे. त्यामुळे शासनाने याप्रकल्पाबाबत पुनर्विचार करावा, अशी आमची मागणी आहे, असे संकुलातील रहिवाशी प्रविण सिंग यांनी सांगितले.

घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत. त्यासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामामध्ये तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी केवळ ५४९ वृक्षांचे पुर्नरोपण होणार आहे. उर्वरित १ हजार ६४७ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे महापालिकेला दिला असून या प्रस्तावामुळे घोडबंदर मार्गावरील हरित पट्टा कमी होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वादात सापडला असतानाच, स्थानिक रहिवाशांनी हा प्रकल्प नकोच असा सुर लावल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *