मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मान्सून दाखल झाल्यानंतर गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. पण पिण्याच्या पाण्याची अडचण मात्र कायम राहिली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील साठा कमी झाल्याने मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती. जून महिन्यात मान्सून दाखल झालाय पण अजूनही धरणातील पाणीसाठा अपेक्षित असा भरलेला नाहीय. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
यंदा मुंबई आणि परिसरात 2 दिवस आधी मान्सून दाखल झाला.मात्र असं असलं तरी पावसानं अद्याप जोर धरलेला नाही. पावसाच्या तुरळक सरी कोसळतायत. मात्र, या पावसामुळे तलावांत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. याचा परिणाम मुंबईकरांच्या पाण्यावर होतोय.
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणक्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असला तरी अद्यापही पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही.जून महिना उलटूनही अजून पाणीसाठा 6 टक्केही झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
पाणीकपात सुरूच राहणार
गेल्या काही वर्षांतील हा सर्वात कमी पाठीसाठा आहे. त्यामुळं मुंबईत सुरू असलेली पाणीकपात सुरूच राहणार आहे. सध्या 7 धरणांमध्ये मिळून केवळ 85 हजार 605 एमएलडी इतका पाणीसाठा असून रोज 3800 एमएलडी पाणी मुंबईसाठी लागते. त्यामुळं जुलै महिन्यात तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस लागेल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत.
दरम्यान राज्यातील पावसासंदर्भात महत्वाची अपडेट हवामान विभागाने दिली आहे. आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील तीन आठवडे पावसाच्या संततधारेचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरदेखील पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
