धार्मिक, ऐतिहासिक वास्तूंसाठी भरीव निधी; दिंडीसाठी २० हजारांचे अर्थसहाय्य

पंढरपूरला लाखो वारकरी आषाढी यात्रेसाठी पायी जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे पंढरपूर वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. ‘निर्मल वारी’ योजनेअंतर्गत ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्याकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आजारी वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील.

● शिवकालीन १२ किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त होण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी व गणेशोत्सवाबाबत याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येतील.

● शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक निधी पुरविण्यात येणार आहे.

● नागपूर जिल्ह्यातील रामटेक तीर्थस्थळाच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यात २११ कोटी रुपयांची विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत.

● आध्यात्मिक गुरु व समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांच्या मौदा तालुक्यातील (जि.नागपूर) पावडदौना येथील स्मारकासाठी ७७ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

● संत ज्ञानेश्वर महाराजांनी अजरामर ज्ञानेश्वरीची रचना केली, त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

● छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा (जि.सांगली) येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुर्जी (जि.अमरावती) येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *