संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई शहर तसेच उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत मागील दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. शहरातील मलबार हिल, कुलाबा, प्रभादेवी, दादर, चर्चगेट परिसरात दुपारनंतर पावसाने जोर धरला. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याचबरोबर उपनगरातील बोरिवली, गोरेगाव आणि अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २१.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २८.१ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने मुंबईत काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी, मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे सक्रिय असून पुढील एक-दोन दिवसांत मोसमी पाऊस राज्यात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने
मुंबई : मुंबई महानगरात शुक्रवारी सकाळनंतर मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा खोळंबली. मध्य रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास उशीर झाला. मुंबई महानगरात शुक्रवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कुर्ला, दादर, कांदिवली, बोरिवली या भागांत पावसाचा जोर वाढला. मध्य, पश्चिम रेल्वेवरील दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला. लोकल विलंबाने धावत असल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. दुपारी पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, लोकल विलंबाने धावत असल्याने मध्य रेल्वेवरील काही धिम्या लोकल जलद मार्गावर चालविण्यात आल्या.
जोरदार बरसणार
● मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा
● रायगड, रत्नागिरी, पुणे
● वादळी पावसाचा अंदाज ● अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ
