चुनाभट्टीतील नागरिकांना पूर्वी सोमय्या रुग्णालय आणि पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने २००१ला एव्हरार्ड नगर बस थांबा ते चुनाभट्टी असा हा भुयारी मार्ग तयार केला. मात्र गेल्या काही वर्षांत या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे.
अनेकदा भुयारी मार्गात पाणी येत असल्याने विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर तेथे मोठया प्रमाणात पाणी भरत असल्याने पालिकेला तेथे पंप बसवावे लागतात. गेल्या काही महिन्यांपासून भूयारी मार्गाला एव्हरार्ड नगरच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन नागरिक हा भूयारी मार्ग पार करत आहेत.
एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने या भुयारी मार्गाची दुरुस्ती करून तेथे पादचारी पूल बांधावा अशी मागणी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिकेच्या एल विभागाला पत्रही दिले आहे.