उत्‍तर रायगडात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

एकीकडे दक्षिण रायगडमध्ये शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. उत्तर रायगड मधील शेतकरी मात्र चिंतातूर आहे. पावसाआभावी अनेक ठिकाणी भातरोपांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जिल्‍हयात साधारण मे महिन्‍याच्‍या अखेरीस धूळवाफ्यावर भाताची पेरणी केली जाते. पाऊस पडेल या आशेवर पावसापूर्वीच ही पेरणी होत असते. पाऊस जर वेळेवर किंवा पुरेसा झाला नाही तर भाताचे दाणे उन्‍हाच्‍या तडाख्‍याने तडकून फुटतात. आणि हे दाणे रुजत नाहीत अशा परीस्थितीत पुन्हा पेरणी करण्याशिवाय पर्याय नसतो. यंदा पाऊस वेळेवर दाखल झाला. सुरुवातीला चांगला बरसलाही पण नंतर मात्र पावासाने ओढ दिली. अनियमित आणि अपुरा पाऊस पडत राहीला. उत्तर रायगडात काही ठिकाणी रुजवण झाली नाही. जिथे झाली तिथे रोपांची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे.

महत्वाची बाब म्हणजे एकीकडे जिल्‍हयाच्‍या दक्षिण भागात मागील आठवडयातच लावणीच्‍या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र उत्‍तर भागात शेतकरी भात रोपांच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे क्रमप्राप्त झाले आहे.

कशी करतात दुबार पेरणी

भाताची दुबार पेरणी रोहू पद्धतीने केली जाते. एका टोपलीत भाताचा पेंढा पसरवून त्‍यात भाताचे बियाणे टाकले जाते. ते बियाणे पाण्‍याने भिजवून वरून पेंढयाचे आवरण टाकतात. ही टोपली ४ ते ५ दिवस तशीच बंदिस्‍त अवस्‍थेत ठेवली जाते. त्‍यानंतर दाण्‍याला मोड येतात. या मोड आलेल्‍या बियाण्‍याची शेतात थोडा चिखल करून पेरणी केली जाते.यालाच रोहू पदधत असे म्‍हणतात.

जिल्ह्यात सरासरीच्या १२ टक्केच पाऊस

रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे ३ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. जून आणि जुलै हे सर्वाधिक पावसाचे महिने असतात. मात्र यावर्षी सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत १२ टक्के पाऊस झाला आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *