इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर केल्याबद्दल आठ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांनी 31 मार्च रोजी संस्थेच्या परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल दरम्यान हे नाटक सादर केलं होतं. काही विद्यार्थ्यांनी या नाटकाविरोधात तक्रार दाखल केली होती. हे नाटक हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित असून त्यात हिंदू श्रद्धा आणि देवतांचा अपमानजनक संदर्भ असल्याचं विद्यार्थ्यांनी तक्रारीत सांगितलं होतं.
नाटकात मुख्य पात्रांना योग्यप्रकारे सादर करण्यात आलं नसून “स्त्रीवादाचा प्रचार” करण्याच्या नावाखाली सांस्कृतिक मूल्यांची खिल्ली उडवली असंही तक्रारीत सांगण्यात आलं होतं. तक्रारीची दखल घेत 8 मे रोजी शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर 4 जून रोजी संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षा जाही करत दंड ठोठावण्यात आला.
संस्थेने चार विद्यार्थ्यांना 1 लाख 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. जवळपास एका सेमिस्टरची इतकी फी आहे. तर इतर चार विद्यार्थ्यांना 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षा देण्यात आली आहे. ज्यानुसार, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या संस्थेच्या जिमखाना पुरस्कारांवरील बंदीचा समावेश आहे. कनिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधांपासून वंचित राहावं लागणार आहे.
