कोयना एक्स्प्रेसने दोन महिलांसह चिमुकलीला चिरडलं, कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; महाराष्ट्र हादरला

मुंबईतून कोल्हापूरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रेल्वेने तीन जणांना चिरडले असल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. यामुळे ही दुर्घटना अपघात आहे की आत्महत्या? याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंगावरुन चाक गेल्याने मृत्यू

मुंबईहून कोल्हापूर मार्गावर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातल्या मार्केट यार्डपासून पुढे छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकडे येत असताना विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरून चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसची तिघींना जोराची धडक बसली. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि लहान मुलगी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. तिघींच्या अंगावरुन रेल्वेचे चाक गेल्यामुळे तिघींच्या जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

रेल्वेचा वेग कमी केला अन्…

मृत्यू झालेल्या महिलेमधील एक महिला ४० ते ४५ तर दुसरी २५ ते ३० वयोगटातील आहे. दोघींचाही चेहरा छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी १० ते १२ वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. रुळावर धडक बसताच लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी करत काही अंतरावर नेऊन थांबवली. रेल्वे अचानक थांबल्याने परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेने आले. यावेळी या तिघींचेही मृतदेह आढळून आले. लोको पायलटने ही माहिती रेल्वेगार्डला दिली. त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

अपघात की घातपात?

जोराची धडक बसल्याने तिघींच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले असून चेहराही विद्रूप झाला आहे. यामुळे पोलिसांना ओळख पटवणे जिकीरीचे बनले आहे. शेजारील विक्रम नगरातील अनेक नागरिकांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत या मृतांची ओळख पटली नाही. पोलिसांनी तिन्ही मृतदेह सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खरतर जिथे ही दुर्देवी घटना घडली तेथे एका बाजूला वस्ती आहे. दुसऱ्या बाजूला काहीशी विरळ वस्ती आहे. या ठिकाणी पायवाट आहे, त्यावरून लोक ये-जा करत असतात. यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडल्याची शक्यता कमी असून घातपाताचा संशय असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *