घोडबंदर मार्ग ठप्प; घाटरस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या रांगा

ठाणे आणि मुंबई अहमदबाद मार्गांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बंदी असतानाही अवजड वाहनांची भरदिवसा घुसखोरी सुरू असल्याने त्याचा परिणाम गुरुवारी वाहतुक व्यवस्थेवर झाला. सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या गायमुख ते वाघबीळ पर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बोरीवली, वसईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल होत आहेत. अवजड वाहनांची वाहतुक सुरू असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असतात. त्यामुळे येथील घाट रस्त्याच्या तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. घोडबंदर मार्ग हा ठाणे तसेच मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडतो. उरण येथील जेएनपीटी येथून जाणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई किंवा गुजरातच्या दिशेने ये-जा करत असतात. राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या (एसटी), महापालिका परिवहन विभागाच्या बसगाड्यांसह हलक्या वाहनांची वाहतुक येथून मोठ्याप्रमाणात होत असते. येथील दुरुस्ती कामामुळे वाहन चालकांना दररोज कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. गुरुवारी घोडबंदर मार्गावर गायमुख घाट, कासारवडवली ते वाघबीळ पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जड अवजड वाहनांना दुरुस्तीच्या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही या मार्गावर अवजड वाहतुक सुरू असल्याचे चित्र होते. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर वार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे पाऊण तास लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *